टीम लोकमन मंगळवेढा |
संत विचारातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंगळवेढा येथील वारी परिवारामुळे मंगळवेढ्याची स्मशानभूमी परिवर्तनाची नांदी ठरत आहे. सद्यस्थितीत मंगळवेढा स्मशानभूमीत (मातीवेळी) तिसऱ्या दिवशी घास शिवण्यासाठी कावळ्याची फार मोठी समस्या निर्माण झाली असुन लोकांना स्मशानभूमीत ताटकळत बसावे लागले. ही समस्या लक्षात घेऊन कायमस्वरूपी घास शिवण्याचा प्रश्न संपविण्यासाठी स्मशानभूमीत राहणाऱ्या उप्पेवाड कुटूंबाला वारी परिवाराच्या वतीने एक गीर गाय देण्यात आली आहे.
भारतीय संस्कृतीत आईनंतर मातेचा दर्जा हा गाईला दिला जातो. त्यामुळे सदर गोमातेचा आशीर्वाद देखील मृत व्यक्तीच्या आत्म्यास व त्यांच्या परिवारास मिळणार आहे. तसेच घरातील गेलेल्या मृत व्यक्तीची रक्षा (राख) व अस्थी नदीतील पाण्यात, तिर्थक्षेत्री किंवा विहरीत विसर्जन न करता शेतात टाकून त्यावर वृक्षारोपण करणे म्हणजे त्या व्यक्तीबरोबरच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे आहे. रक्षा (राख) नदीमध्ये विसर्जन करण्याऐवजी आपल्या शेतात किंवा योग्यस्थळी विसर्जित करून त्यावर आंबा, वड, पिपंळ, कडुलिंब किंवा कुठलेही फळझाड वृक्ष लावावेत.
हा निसर्ग अविरतपणे आपल्याला ऑक्सीजन पुरवण्याचे काम करतो आणि ऑक्सीजनमुळेच आपल्या मृत व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास मंगळवेढा स्मशानभूमी पर्यंत पोहचला आहे पुढील अनेक पिढ्याना शुद्ध प्राणवायू मिळावा या भावनेने मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करुन मृत व्यक्तीला आपण लावलेल्या झाडाच्या रूपात पाहिले तर ती व्यक्ती झाडाच्या रूपात जिवंत राहील यासाठी पाणी दूषित होऊ नये व पर्यावरणाला हानी होऊ नये यासाठी रक्षा गोळा करून आणि वृक्ष लावून आपण खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिल्यासारखी आहे.
मरावे परी वृक्षरूपी उरावे असा संदेश देणारा डिजिटल बोर्ड लावून मंगळवेढेकरानां आवाहन करण्यात आले आहे. याअगोदरही वारी परिवाराने स्मशानभूमी परिसरात झाडी लावून त्याचे संवर्धन करून हा परिसर हरित केला आहे. तसेच स्मशानात राहणाऱ्या महिलेचा महिला दिनानिमित्त सत्कार करून वेगळा आदर्श उभा केला आहे. खरोखरच वारी परिवाराने वैज्ञानिक दृष्टीकोण ठेवून काळाची पाऊले ओळखून संत विचारांचे बिजारोपण करीत स्मशानभूमीचा कायापालट केला आहे.
यावेळी अजित शिंदे, ॲड. रमेश जोशी, विष्णू भोसले, विजय हजारे, रतिलाल दत्तू, राजेंद्र नलवडे, रितेश मोरे, रविराज जाधव, स्वप्निल टेकाळे, प्रफुल्ल सोमदळे, अविराज जाधव, अरुण गुंगे, परमेश्वर पाटील, दत्तात्रय भोसले, विठ्ठल बिले, पांडुरंग नागणे, विक्रम माने, अजय आदाटे, नानासाहेब चेळेकर, सिद्धेश्वर डोंगरे, प्रा. विनायक कलुबर्मे, सतिश दत्तू यांचेसह उप्पेवाड कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.