टीम लोकमन मंगळवेढा |
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील वजनदार नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड मतदारसंघामध्ये पराभव झाला. पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यामुळे त्यांची आता राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगली होती.
पण आता या चर्चांना बळ मिळाले आहे. राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तसेच त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात देखील समावेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्याच दिल्लीवारीत अमित शाह यांच्यासोबत यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी यापूर्वीही ३ वेळा देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे विनंती केली होती. त्यानंतर आताही देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र यावर केंद्रीय नेतृत्वाने पंकजा मुंडे यांनी जनतेतून निवडून यावे असे सांगितले होते. पणलोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला.
या पराभवानंतर संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रातील ओबीसी समाज दुखावला आहे. पराभवाची कारणे शोधत असताना पंकजा मुंडेंचे राजकीय पुनर्वसन होणे गरजेचे आहे यावरही दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निकालांपूर्वी आणि आता निकालानंतरही पंकजा मुंडेंसाठी देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीकडे कायम पाठपुरावा सुरुच आहे. राज्यसभेवर वर्णी लागताच पंकजा मुंडेंचा केंद्रीय मंत्रिमंडळातही समावेश होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या गोंधळामध्ये मुंडेंचे राजकीय पुनर्वसन हे महत्वाचे ठरणार आहे.
ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडेंच्या सरकारकडे दोन मागण्या
दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे गेल्या 9 दिवसांपासून वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर या शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि अतुल सावे हे मुंबईला जाणार आहे. त्याठिकाणी लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ देखील असणार आहे. ओबीसी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे यांची उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना भेटून गेल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. ‘सत्तेचा गैरवापर करून चुकीची सर्टिफिकेट दिली आहेत का? त्याची चौकशी करावी आणि राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट घ्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी या दोन मागण्या असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.











