टीम लोकमन मंगळवेढा |
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असले तरीही राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीतील नवनवीन वाद बाहेर येताना दिसत आहेत. अशातच महायुतीतील शिंदे गट आणि भाजप पक्षातील नेत्यांमधील वाद आता चर्चेत आला आहे.
कोकणातील कणकवलीत ‘वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर शिंदे गटाचे नेते ‘उदयजी सामंत आणि किरणजी सामंत यांचा फोटो लावण्यात आला आहे. या बॅनरमधून नेमका कोणाला इशारा देण्यात आलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. हा बॅनर कणकवलीतील शिवसेना शाखेबाहेर लावण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुजबूज सुरू झाली होती. सामंत बंधुंवर आरोपही करण्यात आले होते. त्यातूनच हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची ही चर्चा आता कोकण पटट्यामध्ये रंगू लागली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा असून, तो लावण्यामागचा हेतू काय? यासंदर्भातील कयास लावण्याचा प्रयत्न अनेकजण करताना दिसत आहेत.
काय लिहिले आहे बॅनरवर…
‘उदयजी सामंत आणि किरणजी सामंत यांच्या भावी राजकीय वाटचालीस लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा’ असे लिहिण्यात आले आहे, ‘वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ असेही लिहिले आहे. या बॅनरवर शिवसेनेचं चिन्हं धनुष्यबाण दिसत असून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचे फोटोही या बॅनरवर पाहायला मिळत आहेत.













