टीम लोकमन मंगळवेढा |
राज्यात आजचा शुक्रवार हा अपघात ठरला आहे. पुण्याजवळ घडलेल्या दोन विचित्र दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ पहिला अपघात झाला असून त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.
तर दुसरा अपघात हा आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर झाला असून त्यात 3 जण ठार झाले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मक्झिमो गाडी आणि एसटी बसमध्ये विचित्र अपघात झाला. आयशर टेम्पो हा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला जाऊन धडकला त्यामुळे मॅक्झिमो ही गाडी समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली. आयशर आणि बसच्या मध्ये मॅक्झिमो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यामधील 11 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यातील 6 प्रवासी जागीच मृत झाले. चार गंभीर जखमींवर नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची सुद्धा प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तर दुसरा अपघात हा जेजुरीजवळ घडला आहे. आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर बेलसर फाट्याजवळ एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले. रमेश किसन मेमाणे ( वय 60), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय 40), पांडुरंग दामोदर मेमाणे (वय 65) हे अशी मृतांची नावे असून ते तिघेही बोरमाळ वस्ती, पारगाव मेमाणे, ता. पुरंदर जि. पुणे येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर फाटा दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. दुचाकीवर असणारे तिघेजण रस्ता क्रॉस करून जात असताना एसटी बस व दुचाकीचा अपघात झाला. ही घटना काल दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली आहे.
एसटी चालकाने गाडीचा वेग कमी करून बस रस्त्याच्या खाली घेण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी बसखाली गेल्याने दुचाकीला फरफटत नेले. या अपघातात दुचाकी वरील तिघेजण जखमी झाले. तिघांना जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिघांचा मृत्यू झाला. एकाच वस्तीवरील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने पारगाव मेमाणे गावावर शोककळा पसरली आहे.
मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
या दोन्ही अपघातांचे वृत्त समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या. असे निर्देशही पुणे पोलिस अधीक्षकांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.










