टीम लोकमन मंगळवेढा |
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र ठरल्याची माहिती आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेतून हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठरलेल्या फॉर्मुल्यामध्ये चार-पाच जागा मागेपुढे होऊ शकतात, मात्र महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे.
भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढविणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला 60 तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला 70 जागा देण्यात येणार आहेत. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडील विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या गटाला सोडल्या जातील. मात्र काही जागा यास अपवादही ठरतील असेही वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा प्रचंड गोंधळ उडाला व त्याचा फटका महायुतीला बसला होता. यावेळी मात्र कोणताही गाजावाजा न करता गुप्तपणे महायुतीच्या शीर्षस्थ नेत्यांनी जागावाटपाची बोलणी केल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकएकटे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विधानसभा जागावाटपाची चर्चा केली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेबाबतचा कटु अनुभव भाजपला आला आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात अत्यंत सावध असलेल्या भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढविणार असल्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाला 60, तर शिंदे गटाला 70 जागाच देणार असल्याचेही स्पष्टपणे सांगितले आहे.
भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 105 जागा जिंकल्या होत्या. तसेच 10 अपक्ष आमदारही भाजपसोबत आहेत. त्यामुळे विद्यमान सर्व जागा भाजप लढणार आहेच. शिवाय याआधी जिंकलेल्या 35 पेक्षा जास्त जागाही लढवण्याचा भाजपचा निर्धार आहे. या 35 जागा महायुतीत सध्या शिंदे गट व अजित पवार गट यापैकी कुणाकडे किती आहेत हे स्पष्ट नाही. मात्र या 35 जागांवरून वाद होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादांची 90 वरून 60 वर घसरण
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा भाजपच्या नेत्यांनी त्यांना विधानसभेच्या 90 जागा देण्याचा शब्द दिला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे त्यांना जास्त जागा देऊन जोखीम उठविण्यासाठी भाजपचे नेतृत्व तयार नाही. अजित पवार गटाच्या वाट्याला केवळ 60 च्या आसपासच जागा येतील. यामध्ये त्यांच्यासोबत आलेले विद्यमान आमदार व काही अपक्ष आमदारही आहेत.
शिंदे गटाला 100 जागांची अपेक्षा पण 70 जागांवरच बोळवण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 जागांची मागणी केली होती. पण त्यांच्या वाट्याला केवळ 70 च्या आसपासच जागा येतील. शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतल्या जिंकलेल्या जागांचे गणित भाजपच्या नेतृत्वापुढे मांडले. पण यातील बहुतांश जागा तिरंगी लढतीत आलेल्या हे आहेत असे भाजपचे म्हणणे आहे. तसेच शिंदे यांच्याकडे उमेदवारही नाहीत. त्यामुळे 70 जागांची लक्ष्मणरेखाच भाजपने त्यांच्यासाठी आखल्याचे दिसत आहे.









