टीम लोकमन मंगळवेढा |
भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वक्तव्य करत असताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता प्राजक्ता माळी यांनी यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडमध्ये आले आहे.
प्राजक्ता माळी यांनी मुंबई पोलिस आणि बीड पोलिसांना अर्ज दिला आहे. प्राजक्ता माळी यांच्या तक्रारीवर आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार करणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना याबद्दलचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण घटनेचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हे एक निमित्त आहे. पण आज मोठ्या प्रमाणात महिलांचे चारित्र्य हनन केले जात आहे. असेही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘प्राजक्ता माळीचा अर्ज महिला आयोगाला प्राप्त झाला आहे. दोन दिवसांमध्ये महिला आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ज्ञ यांनी शहानिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाला पाठवला आहे. त्यासोबतच त्याची एक प्रत बीड पोलिस अधिक्षक आणि सायबर क्राईमकडेही पाठवण्यात आली आहे. सायबरच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल केलेल्या अश्लिल विधानांची चाचपणी व्हावी आणि कारवाई व्हावी. असे निर्देश राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे दिले आहेत.
तसेच संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंघाने कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगामध्ये काम करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तक्रारी आल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या बदनामीमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होतात. सोशल मीडियामुळे फसवणूक आणि वाढलेल्या गुन्हेगारीची संख्या वाढली आहे. आम्ही अनेक उपाययोजना राबवत आहोत तरी त्यात काही यश आले नाही. अनेक महिला तक्रार करायला घाबरतात असेही चाकणकर यांनी सांगितले.











