टीम लोकमन सोलापूर |
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण मे महिन्यात गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदाच प्लसमध्ये आले आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे 21 मे रोजी मायनस 23 टक्क्यांवर पोचलेला उजनीतील पाणी पातळी मायनस दोन टक्क्यांवर आली आहे.
गेल्या 6 दिवसांत उजनीत तब्बल 12 टीएमसी पाणी जमा झाले असून सध्या धरणात दौंड व धरण परिसरातून पाणी जमा होत आहे. त्यामुळे आज मंगळवारी दुपारपर्यंत धरण प्लसमध्ये येईल असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनीतून शेतकऱ्यांसाठी 2 आवर्तने सोडावी लागली. याशिवाय सोलापूर शहरासाठी देखील भीमा नदीतून पाणी सोडावे लागले. त्यामुळे 18 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा मायनस पातळीत गेला होता. एका महिन्यांत धरणाची पातळी मायनस 23 टक्के झाली होती. मॉन्सूनचे आगमन आणि जिल्ह्यातील यापूर्वी झालेला पाऊस यामुळे धरणाची पातळी यंदा मेअखेर मायनस 50 टक्क्यांवर खाली जाईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता.
परंतु मागील 8-10 दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे मायनस 23 टक्के झालेले उजनी धरण आता 27 मे रोजी प्लसमध्ये आले आहे. मे महिन्यात धरणाची पातळी प्लसमध्ये होण्याची गेल्या 45 वर्षांतील हि पहिलीच वेळ आहे. धरणात सध्या दौंडवरून 19 हजार आणि धरण परिसरातील पावसाचा जवळपास 11 हजार क्युसेकचा विसर्ग धरणात जमा होत आहे.
उजनी धरणात अवघ्या 2 दिवसात धरणात साडेसात टीएमसी पाणी जमा झाले आहे. 25 मे रोजी मायनस असलेले धरण 26 मे रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत मायनस 2.73 टक्क्यांपर्यंत आले आहे. सध्याचा 30 हजाराचा विसर्ग असाच राहिला तर पुढील 12 तासांमध्ये धरणात 1 टीएमसीपेक्षा जास्त पाणी जमा होईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.