टीम लोकमन सोलापूर |
ग्रामीण भागातील कुटुंबांना नियमित, पुरेशा प्रमाणात व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी शाश्वतपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी ‘जल सेवा आंकलन’ या ग्रामपंचायतच्या नेतृत्वाखालील मूल्यांकन साधन कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
आतापर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांचे कार्यक्षमता मूल्यांकन ठराविक कालावधीत तृतीय पक्ष सर्वेक्षणांद्वारे करण्यात येत होते मात्र गावपातळीवरील पाणी सेवांसाठी सतत, स्थानिक मालकीची व पारदर्शक देखरेख यंत्रणा संस्थात्मक करणे आवश्यक असल्याने ‘जल सेवा आंकलन’ या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
जल सेवा आंकलन : संकल्पना व उद्दिष्टे
जल सेवा आंकलन म्हणजे गावातील पाणी पुरवठा सेवांची कामगिरी ग्रामपंचायत व गाव पाणी व स्वच्छता समिती यांच्या नेतृत्वाखाली पद्धतशीरपणे मूल्यांकन करणे होय. या उपक्रमाचे उद्घाटन 30 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले आहे. या मूल्यांकनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांना पाणी पुरवठा नियमितपणे, पुरेशा प्रमाणात व स्वीकार्य गुणवत्तेनुसार मिळत आहे का, तक्रारींचे निवारण कसे होत आहे, वापरकर्ता शुल्क संकलनाची स्थिती, तसेच पाणीपुरवठा यंत्रणेची संचालन व देखभाल याबाबतची माहिती नोंदविण्यात येणार आहे.
जल सेवा आंकलनची प्रमुख उद्दिष्टे
• ग्रामपंचायत व गाव पाणी व स्वच्छता समिती यांना पाणीपुरवठा योजनांच्या कामगिरीचा पद्धतशीर आढावा घेण्यासाठी सक्षम करणे.
• गावपातळीवर मालकीभावना व जबाबदारी अधिक बळकट करणे.
• पारदर्शक व समुदाय-आधारित सेवा माहितीची खात्री करणे.
• जिल्हा व राज्य पातळीवर नियोजन व सहाय्यक उपक्रमांसाठी विश्वसनीय माहिती उपलब्ध करणे.
• ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेतील शाश्वत संचालन, देखभाल व नागरिकांचा विश्वास दृढ करणे.
संस्थात्मक कार्यप्रवाह
गाव पाणी पुरवठा व स्वच्छता समिती / पाणी समितीमार्फत संचालन व देखभाल, दुरुस्ती, तक्रारी व वापरकर्ता शुल्क संकलनाची नोंद ठेवण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामसभेमध्ये पाणी पुरवठा योजनेची सर्व माहिती व निष्कर्ष मांडून त्यावर चर्चा करून पारदर्शकता राखली जाणार आहे.ग्रामपंचायत सचिव ई-ग्रामस्वराज पोर्टलवरील ‘मेरी पंचायत’ लॉगिन लिंकद्वारे पंचायत डॅशबोर्डवर अंतिम मंजूर जल सेवा अंकलन तपशील प्रविष्ट करतील.प्रविष्ट केलेली माहिती ‘मेरी पंचायत’ अँपद्वारे नागरिकांना दृश्यमान होणार असून नागरिकांकडून अभिप्राय देण्याची सुविधाही उपलब्ध असेल. तालुका पाणी व स्वच्छता मिशन कक्ष सहाय्य आवश्यक असलेल्या गावांची ओळख करून समस्या निवारणास मदत करेल, तर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हास्तरीय ट्रेंड्सचा आढावा घेऊन प्रणालीस्तरीय सुधारणा व नियोजनासाठी आवश्यक निर्णय घेईल.
तालुका प्रशासनाची भूमिका
पाणी पुरवठा योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुका प्रशासनाचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे असून, तालुकास्तरीय समन्वय बैठकांचे आयोजन, ग्रामपंचायतींना अंमलबजावणीमध्ये सहकार्य, तसेच योजना संचालनातील अडचणी सोडविण्याची जबाबदारी तालुका प्रशासनावर असेल. ग्रामपंचायत अधिकारी व गाव पाणी व स्वच्छता समिती सदस्यांसाठी जल सेवा आंकलन फ्रेमवर्क, पंचायत डॅशबोर्डवर माहिती नोंदणी याबाबत प्रशिक्षण व क्षमता बांधणीस तालुका प्रशासनाने पाठिंबा द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मूल्यांकनाची कालमर्यादा
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी जल सेवा आंकलन मूल्यांकनाचा पहिला टप्पा 26 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ घोषित जिल्ह्यातील 1125 मधील 1008 गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून, तालुकास्तरीय जल जीवन मिशन उपक्रमाचे सक्रिय नेतृत्व महत्त्वाचे ठरणार आहे. जल सेवा आंकलन यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणा व अधिकारी यांनी समन्वयाने व गांभीर्याने कार्य करावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेटटी यांनी केले आहे.







