टीम लोकमन मंगळवेढा |
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत आदर्श गावाकडे वाटचाल करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावातील ग्रामस्थांनी एक अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. लोकाभिमुख सरपंच बाबासाहेब कसबे यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम राबविण्यात येणार असून गावात आता अभ्यासाचा भोंगा वाजणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथे 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शिरसी गावचे प्रथम नागरिक सरपंच बाबासाहेब कसबे यांच्या संकल्पनेतून गावातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा शिरसी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गावात हा अनोखा उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत शिरसी गावात अभ्यासाचा भोंगा हा अतिशय अनोखा व महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे ठरले. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वाढता मोबाईल वापर, पालकांचा टीव्ही व मोबाईलचा सातत्याने होणारा अतिवापर, सोशल मीडियामध्ये अहोरात्र गुरफटलेली तरुणाई, सोशल मीडियाच्या जमान्यातील मोबाईलच्या अतिवापरामुळे शाळकरी मुलं शुभंकरोती… ऐवजी एक नंबर तुझी कंबर… या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहेत. घरातील वडीलधाऱ्यांचा आदरयुक्त धाक हळूहळू संपुष्टात येऊ लागला आहे. अभ्यासाची शिस्त आणि संस्कार कमी होत चालले आहेत. म्हणूनच शिरसी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय आणि शिस्त लावण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत सायंकाळी 7 ते 9 अशी अभ्यासाची वेळ ठरविण्यात आली. दररोज सायंकाळी 7 वाजता अभ्यासाचा भोंगा वाजणार आहे. भोंगा वाजल्यानंतर गावातील विद्यार्थी अभ्यासाला बसतील. या काळात गावामधील सर्व घरातील टीव्ही, मोबाईल बंद ठेवण्यात येणार आहेत. 2 तास विद्यार्थी अभ्यासाला बसतील तसेच या काळात पालक त्यांच्यावर नियंत्रण ठेवतील. या अनोख्या उपक्रमामुळे दररोज 2 तास गावातील विद्यार्थ्यांचा अभ्यास आता विनाअडथळा होणार आहे.
या विशेष सभेसाठी सरपंच बाबासाहेब कसबे, उपसरपंच शहाजी औताडे, माजी सरपंच बाबासाहेब गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री वेताळ विद्यामंदिर शिरशी येथील शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरसीची आदर्श गावाकडे वाटचाल….
मंगळवेढा शहरापासून दूर, मंगळवेढा व सांगोला तसेच जत तालुक्याच्या हद्दीवर असणारे आणि विकासापासून दुर्लक्षित असणारे हे गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुण तडफदार, उत्साही, कर्तबगार व कर्तव्यनिष्ठ ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव यांनी शिरसी ग्रामपंचायतीचा पदभार घेतल्यापासून गावामध्ये अमुलाग्र बदल झाला असून शिरसी गावचा चेहरामोहरा बदलत चालला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यासाठी शिरसी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून सतत कार्यमग्न असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव तल्लीन होऊन या उपक्रमात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरपंच बाबासाहेब कसबे, उपसरपंच शहाजी औताडे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या साथीने आणि ग्रामस्थांच्या सोबतीने या अभियानात सर्वजण झोकून देऊन काम करत आहेत. याचे फलित म्हणून शिरसी गावचा चेहरा मोहरा बदलणार असून जिल्ह्यातील एक आदर्श गाव म्हणून हे गाव आपली ओळख निर्माण करेल यात शंका नाही.








