टीम लोकमन वर्धा |
राज्यातील विशेषतः विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे आज रविवारी रात्री निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. केल्या 40 वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास आले आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक कार्यकर्ते घडवले. गरीब परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी आपल्या सौम्य, मृदूभाषेमुळे विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात काँग्रेस पक्षातून केली होती. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी संसदेत वर्धा मतदार लोकसभा मतदार संघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत लोकसभेसह राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. ते 3 वेळा विधान परिषद सदस्य होते. 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमच नव्हे तर सर्वच निवडणुकीतील रणनितीचा देखील भाग राहिले होते. परंतु त्यापूर्वी ते 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोदच्या सरकारमध्ये विदर्भातून मंत्री होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
अनेक वर्षे मंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषवित 1991 मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला होता. यानंतर रामटेक (1996 व वर्धा 1998) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते होते. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालयासह त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.
वर्धा येथील सावंगी मेघे येथे त्यांनी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे मोठे साम्राज्य उभे केले आहे. राजकारणात अनेक व्यक्ती नात्यापलीकडच्या असतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दत्ता मेघे यांच्या बाबतीत दिसते. मृत्युपत्रात कुठेही काही घोळ होऊ नये, कसलीही अडचण येऊ नये याकरिता दत्ता मेघे यांच्या मृत्युपत्रात केंद्रीय नितीन गडकरी यांचे नाव लिहिले असल्याचे गुपित खुद्द दत्ता मेघे यांनीच जाहीररीत्या उघड केले होते. यावरून त्यांच्यातील एक मित्रही पुढे आला होता.






