टीम लोकमन गेवराई |
राज्यात 26 मे रोजी पावसाचा धुमाकूळ सुरु असतानाच बीडमध्ये भीषण अपघात झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा बीड जिल्ह्याच्या गेवराई येथे अतिशय भयंकर अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
गेवराई येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ झालेला हा अपघात इतका भयंकर होता की रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला होता आणि जिकडे तिकडे रक्त होतं. या अपघातानंतर गेवराईमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेवराई येथील काही नागरिकांची चारचाकी गाडी तांत्रिक बिघाडामुळे गढी परिसरात बंद पडली होती. या गाडीला आणण्यासाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावर जिकडे तिकडे रक्तच होतं.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताला कारणीभूत ठरलेला कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघाताने गेवराई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.