टीम लोकमन मंगळवेढा |
जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ११ हजार ८५ शिक्षकांची भरती प्रक्रिया पार पडली असून, त्यांची निवड यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांच्या नेमणुका रखडल्या होत्या.
मात्र आता त्याला हिरवा कंदील मिळाल्याने कागदपत्रांची पडताळणी होऊन त्यांना लवकरच नेमणुका मिळू शकतील. मात्र एक अवघड प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. आता भरती झालेल्या शिक्षकांना पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही, एकाच जिल्ह्यात त्यांना निवृत्त होईपर्यंत कर्तव्य बजावावे लागणार आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत काही दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविली होती. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यांना येता आले नाही. आता निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना कार्यमुक्ती मिळू शकते. पण, आंतरजिल्हा बदलीची ही शेवटची प्रक्रिया असणार आहे. नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना निवृत्त होईपर्यंत त्याच जिल्ह्यात काम करण्यास तयार असल्याचे लेखी द्यावे लागणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गावरील शिक्षक नव्याने निवड होऊन इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या वर्गांसाठी गेला तर त्यास बाहेरील जिल्ह्यात जाण्यास परवानगी असणार आहे. मात्र, एकदा भरती झालेला शिक्षक त्याच पदावर काही वर्षांनी पुन्हा स्वजिल्ह्यात जाणार नाही. शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच त्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांमधील जवळपास पाच हजार पदे तर खासगी अनुदानित संस्थांमधील पाच हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया २० मेपासून सुरू होईल. जाहीर झालेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर सुरू करायला परवानगी मिळावी, अशी मागणी शालेय शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याला होकार मिळाल्यानंतर आता त्यादृष्टीने तयारी सुरू झाल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली. दरम्यान, मागील भरती प्रक्रिये वेळी ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा नव्याने पुढील भरतीसाठी अर्ज करावा लागणार नाही.