तासगाव : नेताजी खरात
सांगली जिल्ह्यातील तासगाव – मणेराजुरी मार्गावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये सहाजणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या दुर्घटनेत एकजण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
या अपघातात ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये दणकन आदळली. या जबर धक्क्याने कारमधील सहा जण जागीच गतप्राण झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
या दुर्घटनेतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जाते. हे कुटुंब तासगावमधीलच होते. अपघाताच्यावेळी ऑल्टो कारमध्ये एकूण सात जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त हे सर्वजण कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. चालकाच्या डोळ्यांवर झोप असल्याने त्याला डुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे.
दुर्घटनेतील मृतांची नावे खालीलप्रमाणे
मयत नावे राजेंद्र जगन्नाथ पाटील – वय 60, सुजाता राजेंद्र पाटील -वय 55, प्रियांका अवधूत खराडे वय 30 (बुधगाव), ध्रुवा- वय 3 वर्ष, कार्तिकी- वय 1 वर्ष, राजवी- वय 2 वर्ष, जखमी स्वप्नाली विकास भोसले वय 30 वर्ष.
…. आणि ‘तो’ वाढदिवस ठरला ‘राजवी’ चा शेवटचा वाढदिवस
तासगाव येथील वरचे गल्लीमध्ये राहणारे अभियंता राजेंद्र पाटील आपल्या कुटुंबासह लाडकी नात राजवी हिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी कवठेमंकाळ तालुक्यातील कोकळे येथे गेले होते. वाढदिवस करून तासगाव कडे परतत असताना काळाने त्यांच्या कुटुंबावर घाला घातला. या अपघातात राजेंद्र पाटील, त्यांच्या पत्नी, एक मुलगी आणि तीन कोवळ्या निरागस नाती यांना जीव गमवावा लागला तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. जिच्या वाढदिवसासाठी हे संपूर्ण कुटुंब कोकळे गावी गेले होते ती लाडकी नात राजवीला सुद्धा काळाने हिरावून घेतले. त्यामुळे हा वाढदिवस राजवीच्या आयुष्यातील शेवटचा वाढदिवस ठरला. आता यापुढे कधीच राजवीचा वाढदिवस साजरा होणार नाही.









