टीम लोकमन मंगळवेढा |
भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी जमीन मिळवण्यासाठी आपल्याच गावातील एका गरीब कुटुंबांचं घर जमीनदोस्त केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
इतकेच नव्हे तर या कुटुंबाला दानवे यांनी मारहाण केल्याचेही त्यांनी आरोप करताना म्हटले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती देणारे ट्वीट विजय वडेट्टीवार यांनी केले असून पीडितांचा आक्रोश दाखवणारा व्हिडिओसुद्धा त्यांनी ट्विट केला आहे.
विजय वडेट्टीवारांनी ट्विटमध्ये काय म्हटलयं?
भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी संत्रे कुटुंबाला केलेली मारहाण म्हणजे सत्तेचा माज आहे. एखाद्या गावात जमिनीवर नजर पडली तर ती जागा दानवे यांना मिळालीच पाहिजे. मालकाने जमीन देण्यास नकार दिला तर घर जबरदस्तीने पाडून कुटुंबाला मारहाण करण्यात येते. गरीब बहुजन कुंभार समाजातील असलेले संत्रे कुटुंब दिवस रात्र कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत आहे. पण जमीन हडपण्यासाठी या कुटुंबाला रावसाहेब दानवे आणि भाजपच्या गुंडांकडून त्रास दिला जातो, मारहाण केली जाते. भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणायचे आहे का? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.
पोलीस व महसूल प्रशासन काय करत आहे?
दानवे आणि त्यांचा आमदार पुत्र संतोष दानवे यांच्या गुंड कार्यकर्त्यांना आता जवखेडा गाव कंटाळले आहे. मारहाण करून घर उध्वस्त केल्याचा गंभीर आरोप संत्रे कुटुंबियांनी त्यांच्यावर केला आहे. जवखेडा गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753, एम. साठी रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी संत्रे कुटुंबाला मारहाण केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने आपले घर उध्वस्त केल्याचा आरोप पीडित संत्रे कुटुंबाने केला आहे.
अज्ञात आठ ते दहा जणांनी रात्रीच्या सुमारास घरात घुसून मारहाण करत घर उध्वस्त केल्याची घटना रावसाहेब दानवेंच्या गावात घडली आहे. जवखेडा गावातील संत्रे कुटुंबियांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून न्याय मिळावा मागणी केली आहे. या प्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे हसनाबाद पोलिसांनी अज्ञात आठ ते दहा जणाविरुद्ध संत्रे कुटुंबियांना मारहाण करून त्यांचे घर उध्वस्त केल्याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु हा तपास समाधानकारक नाही.
हायवे जात असताना स्वतःच्या जमिनी, घर वाचवायचे पण दुसऱ्यांची जमीन घ्यायची ही सत्तेतील मस्ती आहे, आम्ही ही मस्ती उतरवणार. संत्रे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. या कुटुंबाला काही झाले तर रावसाहेब दानवे आणि त्यांचे कुटुंब याला जबाबदार ठरेल. संत्रे कुटुंबाने दानवे यांचे नाव घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दखल करून चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.









