टीम लोकमन मंगळवेढा |
हिरवाईने नटलेली झाड आपल्याला श्वास देत असतात. मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचं अस्तित्व टिकणं हे अत्यंत गरजेचे आहे. झाडांची हिरवाई केवळ वातावरण शुद्ध ठेवत नाही, तर मानवाचे आरोग्य, पावसाचे चक्र आणि संपूर्ण जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आधारस्तंभ ठरते. त्यामुळे झाडे लावणे आणि त्यांची हिरवाई टिकवणे ही काळाची गरज बनली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. झाडाच्या हिरवाईत आपलं भविष्य आहे, म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध हास्य कवी व वक्ते सुनील जवंजाळ यांनी केले.
पीएम श्री नगरपालिका मुलांची शाळा नंबर-2 या ठिकाणी आयोजित केलेल्या पर्यावरण संवर्धन विषयक कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक राजकुमार मांजरे, उपशिक्षक सुनील शिंदे, शिवलिंग राऊत, उत्तम ढगे, स्वप्निल लाळे, शुभांगी जोशी, रिजवाना काझी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख शिवलिंग राऊत यांनी करून दिला.
पुढे बोलताना जवंजाळ म्हणाले की, प्लास्टिकचा वापर कमी करणे हीच स्वच्छ भविष्याची पहिली पायरी आहे.कचरा वेगळा करून टाकल्यास पुनर्वापर सुलभ होतो आणि पर्यावरण वाचते.ओला व सुका कचरा योग्य प्रकारे व्यवस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. एकदा वापरायच्या प्लास्टिकला नकार देणे म्हणजे निसर्गाला दिलेली खरी साथ आहे. यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या विनोदी कवितांच्या व प्रसंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अतिशय विनोदी शैलीत सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उत्तम ढगे यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक सुनील शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.







