टीम लोकमन मरवडे |
कलावंतांचे माहेरघर म्हणून नावलौकिक असलेल्या मरवडे फेस्टिव्हलचा रौप्यमहोत्सवी सोहळा मोठ्या थाटात संपन्न होत असून या सोहळ्याच्या निमित्ताने भरगच्च सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली.
तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर होणाऱ्या गाव यात्रेला जोडूनच सन 2000 पासून मरवडे फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. कोरोना संकटकाळातील एका वर्षाचा खंड वगळता हा कार्यक्रम निरंतर राबविला जात आहे. कलावंत व लोककलावंतांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून मरवडे फेस्टिव्हलकडे पाहिले जाते. म्हणूनच रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवार दिनांक 17 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता कलावंतांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये शेकडो कलावंत व पारंपरिक वाद्य कलाकार सहभागी होणार आहेत.
मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती परिवाराच्या विविध उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देऊन मरवडे नगरीचा लौकिक सर्वदूर पोहचविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात येणार असून त्यानंतर लगेचच विरेंद्र केंजळे प्रस्तुत ‘साज सातारा ‘ हा सुंदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. बुधवार दिनांक 19 रोजी रात्री 8 वाजता शिवशाहीर रंगराव पाटील व कला पथक (कोल्हापूर) प्रस्तुत ‘मुद्रा भद्राय राजते’ हे ऐतिहासिक पोवाडा नाट्य आयोजित करण्यात आले असून शिवचरित्रातील 16 प्रसंगांचे सादरीकरण केले जाईल.
गुरुवार दिनांक 20 रोजी सकाळी 10 वाजता मरवडे फेस्टिव्हलचे खास आकर्षण असलेल्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यामध्ये काष्ठशिल्पकार राहुल लोंढे, अमित भोरकडे, राजू रायबान यांच्या सुंदर पेंटिंग्ज, फोटोग्राफीचा आनंद रसिकांना मिळणार आहे. शिवाय युगंधर आखाड्याच्या वतीने ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, तसेच माहेश्वरी कलादालन, यशवंत गाजूल, राकेश गायकवाड यांच्या दुर्मिळ वस्तूंचे देखील प्रदर्शन अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सुंदर रांगोळी, मूर्तीकाम, मातीकाम, कागदकाम या देखील कलाकृती मांडण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन शैक्षणिक सहलीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. याच दिवशी दुपारी 12 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, रंगभरण, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तर संध्याकाळी 8 वाजता जयदीप डाकरे (भूदरगड) प्रस्तुत ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ‘ हा मराठी लोक परंपरेचे दर्शन घडविणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार दिनांक 21मार्च रोजी दुपारी 3 वाजता जिल्हास्तरीय शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये शाळा व शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव (परभणी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील नामवंत निमंत्रित नृत्य कलावंतांचा ‘नृत्य जल्लोष’ साजरा होईल. या संपूर्ण सोहळ्याची सांगता शनिवार दिनांक 22 मार्च रोजी होणार असून सायंकाळी 4 वाजता मंगळवेढा तालुक्याच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या विविध क्षेत्रातील 25 मान्यवरांचा “समाज गौरव पुरस्काराने” विशेष सन्मान केला जाईल.
तर सायंकाळी 7.30 वाजता मरवडे फेस्टिव्हलच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या साहित्य, कला क्षेत्रातील राज्य स्तरीय पुरस्कारांचे वितरण तसेच मरवडे भूषण, श्रावणबाळ तसेच आदर्श माता या पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच निमंत्रित कवींच्या उपस्थितीत ‘काव्यसंध्या’ हा कार्यक्रम होणार असून या संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कवयित्री डॉ. संजिवनी तडेगांवकर (जालना) या भूषविणार आहेत. यावेळी नारायण पुरी (छत्रपती संभाजीनगर), केशवराव खटींग (परभणी), अरुण पवार (परळी), कु. गुंजन पाटील (जळगांव), श्रीनिवास मस्के (नांदेड), रोहित शिंगे (इचलकरंजी), रमजान मुल्ला (सांगली), शरीफ सय्यद (सोलापूर), इंद्रजित घुले, शिवाजी सातपुते (मंगळवेढा) इत्यादी मान्यवर कवींची उपस्थिती लाभणार आहे.
या संपूर्ण सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 7057475610, 9421067107 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन छत्रपती परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.









