टीम लोकमन मंगळवेढा |
एकीकडे मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु असतानाच ओबीसी समाजाचे देखील आंदोलन सुरु आहे. दोन समूहांच्या आंदोलनात धनगर आरक्षणावरुन रान पेटविण्याची भाषा कोणी विरोधकांनी नव्हे तर सरकारमधीलच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, आदिवासी नेते विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ यांनी धनगरांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.
विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या आंदोलनाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सर्व आदिवासी संघटनांच्या प्रमुखांना आणि आमदारांना माझी विनंती आहे. सध्या रखडलेल्या पेसा भरती ( PESA – Panchayat(Extension To Scheduled Areas) Act ,1996) संदर्भात मध्यंतरी विद्यार्थी आणि पालकांसोबत आंदोलन केले होते. त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी 15 तारखेपर्यंत भरती करु. असे आश्वासन दिले होते. परंतू याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. धनगरांची जी घुसखोरी सुरु आहे की आम्ही आदिवासी आहोत. आम्हाला आदिवासीत घ्या. अशी राज्यभर चर्चा सुरु झालेली आहे. कायदा ड्राफ्ट झाला आहे. यासंदर्भात आम्ही आदिवासी आमदारांनी पिचड, गावित साहेब, माजी खासदार हीना गावित अशा सर्वांनी 23 तारखेला बैठक घेतल्याचेही आमदार झिरवळ यांनी यावेळी सांगितले.
आरक्षणातील घुसखोरी रोखा
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले की दोन दिवसात वेळ देतो. परंतू अद्यापही वेळ दिलेली नाही. दोनशे ते अडीचशे मुले मुंबईतील माझ्या सुरुची निवासस्थानी ठाण मांडून आहेत. ती गावी जायला तयार नाहीत. आमचा निर्णय होत नाही. तोपर्यंत जाणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री, आदिवासी विभागाचे सेक्रेटरी, चिफ सेक्रेटरी या सर्वाना निवदेन दिले आहे. आम्ही सर्व आमदार मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. या आंदोलनसाठी महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांचे तरुण फोन करीत आहेत. त्यांना त्यांच्या ठिकाणी शांततेने आंदोलन करण्यासाठी सांगितले आहे. पेसा भरती सुरु करा आणि धनगरांची आमच्या आरक्षणातील घुसखोरी रोखा. अशा आमच्या दोन प्रमुख मागण्या असल्याचे आमदार नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे.















