टीम लोकमन मंगळवेढा |
आषाढी यात्रेसाठी वर्षभर आतुरतेने वाट बघणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने मोठी घोषणा केली असून पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी महामंडळाने यात्राकाळात 5 हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.
उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी थेट त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या बस आगारात संपर्क साधावा असे आवाहनही एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त 4245 विशेष बसेस सोडल्या होत्या. याद्वारे यात्रा काळात 18 लाख 30 हजार 934 भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा एसटी महामंडळाकडून देण्यात आली होती.
40 पेक्षा अधिक भाविक असल्यास मिळणार थेट बस
शेकडो वर्षांच्या परंपरे नुसार पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीं सोबत चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. 40 पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.
फुकटया प्रवाशांना लगाम
यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. फुकटया प्रवाशांना रोखण्यासाठी एसटीचे 200 सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात 24 तास नजर ठेवून असणार आहेत. यामुळे फुकट्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
यात्रेसाठी चार तात्पूरती बसस्थानके उभारणार
पंढरपूर यात्रेनिमित्त राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रास्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








