टीम लोकमन माडग्याळ |
कोळगिरी ता जत येथील शिवाजी लक्ष्मण बिराजदार यांच्या घरास अचानक लागलेल्या आगीत अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना जत तालुक्यातील कोळगिरी येथील सिद्धरडी वस्ती मधील शेतात घडली आहे. या घटनेमुळे कष्टकरी शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला आहे.
जत तालुक्यातील कोळगिरी येथील शिवाजी लक्ष्मण बिराजदार वय 45 हे आपल्या पत्नी व मुलासह शेतातील घरात राहत होते. घरात स्वयंपाक करून झाले असताना गुरुवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास घराला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी, सुन व मुलासह धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. परंतु उन्हाची तीव्रता व जोरदार वारे पाहता त्यांचे प्रयत्न कमी पडले. आणि पाहता पाहता संपूर्ण घराची राखरांगोळी झाली.
या आगीमध्ये शेतामधील काढलेला भुईमूग, कपडे, दोन तोळे सोने, टीव्ही, फ्रिज, संसार उपयोगी साहित्य, मुलांचे शैक्षणिक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे आणि लोखंडाच्या पेटीत ठेवलेली रोख रक्कम 45 हजार रूपये जळून खाक झाल्याने शिवाजी बिराजदार यांचे जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

आगीची माहिती मिळताच गावातील सरपंच आणेश हेळवी यांनी ही माहिती महसूल प्रशासनास फोनद्वारे कळवून सदरील घटनेचा पंचनामा कोळगिरी येथील तलाठी कदम मॅडम यांनी केला आहे. सामाजिक संघटना व सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या कुटुंबास मदत करावी असे आवाहन सरपंच हेळवी यांनी केले आहे.










