टीम लोकमन मंगळवेढा |
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात अँटि करप्शन ब्युरोकडून ही चौकशी सुरु करण्यात आली आहे.
त्यामुळं अजित पवारांच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.
सामच्या वृत्तानुसार, ईडीकडून जरंडेश्वर कारखान्याची चौकशी बंद केली होती. पण आता एसीबीकडून पुन्हा ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. ईडीनं काही महिन्यांपूर्वी जरंडेश्वर कारखान्यासंबंधी कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं त्यामध्ये अजित पवारांचं नाव वगळून त्यांना क्लीनचीट दिली होती.
दरम्यान, अजित पवार सध्या सत्तेत असून उपमुख्यमंत्री आहेत. पण तरीही राज्याच्या गृहविभागाकडून एसीबीमार्फत चौकशी सुरु केली आहे. यासंदर्भातील एक अधिकृत पत्र समोर आलं आहे. यामध्ये जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळ्यातील तसेच या कारखान्याचा कोरेगावमधील एक भूखंड आणि लक्ष्मी ऑरगॅनिक डिस्टलरिज संबंधीची ही चौकशी आहे.
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा १३ मे रोजी संपला त्यानंतर १७ मे पासून या चौकशीला सुरुवात झाली आहे. जरंडेश्वर प्रकरणी ईडीनं अजित पवारांना क्लीनचीट दिल्याने तसेच इन्कम टॅक्स विभागाने देखील याप्रकरणी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना क्लीनचीट दिली होती. त्यामुळे आता अजित पवारांसाठी हे प्रकरण संपल्याचे म्हटले जात होते. पण आता पुन्हा याची एसीबीकडून चौकशी सुरु झाल्यानं नव्या चर्चांना उधाण आले आहे.









