टीम लोकमन सोलापूर |
सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात सोलापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
सुंदरमनगर येथील जलतरण तलाव बंद अवस्थेत असून याची तातडीने दुरुस्ती करून हा जलतरण तलाव जुळे सोलापूर भागातील नागरिकांसाठी सुरू करण्याची मागणी माने यांनी यावेळी केली. गतवर्षी जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे खरीप पिके पूर्णपणे जळून गेली. मात्र केवळ पाच तालुक्यांचाच समावेश दुष्काळी तालुके म्हणून करण्यात आला. तर उर्वरित सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही दुष्काळी मदत मिळाली नसल्याचे सांगून दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पर्जन्यमान चांगले सांगितले जात असून शेतकऱ्यांना खरीप पिके पेरणीसाठी आवश्यक असलेली खते उपलब्ध करून देण्याची मागणी केली. कुमठे ता. उत्तर सोलापूर येथील लमान तांड्यावर 1200 मतदार असून मतदारांचे सोयीसाठी लमाणतांडा येथे मतदान केंद्र असणे आवश्यक आहे. येथील मतदार संख्या, परिसरातील व वस्तीवरील मतदारांच्या सोयीसाठी कुमठे लमान तांडा येथे मतदान केंद्र करण्याची मागणी केली. साखरेवाडी ता. उत्तर सोलापूर या गावामध्ये सुमारे 700 मतदार असून येथील नागरिकांना अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या कळमण येथे मतदानास यावे लागते. त्यामुळे मतदार मतदानाचा हक्कापासून वंचित राहतात. त्यांचे सोयीसाठी साखरेवाडी येथे स्वतंत्र मतदान केंद्र करण्यात यावे अशी मागणी माने यांनी यावेळी केली.

यावेळी गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, बाळासाहेब पाटील, संजय जाधव, उमेश भगत, ज्ञानोबा साखरे, महेश घाडगे, सतीश मस्के, गणपत बचुटे, नितीन भोपळे, अनिल हिबारे, रेवनसिद्ध साखरे, अजय बचुटे, सुनील जाधव, अजय सोनटक्के, मुजफ्फर जहागीरदार, गुरुबाळा पाटील, संजय लोणारी, रवींद्र पाटील, अमोगसिद्ध पाटील, अशोक कलशेट्टी, बसवराज पाटील यांचेसह आमदार दिलीप माने समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











