टीम लोकमन सोलापूर |
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या विकासासाठी सर्वात सक्षम पर्याय आहेत. केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील हा विश्वास असल्यानेच कोळी महासंघाकडून भारतीय जनता पार्टी तथा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा दिला आहे. असे प्रतिपादन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी केले.
कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघातर्फे गुरुवारी शांतीसागर मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रमेश पाटील बोलत होते. व्यासपीठावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, सोलापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी, अरुण लोणारी, प्रकाश बोबडे, देवानंद भोईर, सतीश धडे, चंद्रकांत घोडके, शिवशंकर घुले, लक्ष्मण शिरसाट, विक्रम शिरसाट, भारतीय जनता पार्टीच्या पंचायतराज व ग्रामीण विकास विभागाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष तथा कोळी महासंघाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष राजाराम कोळी, कोळी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ. विजया जाधव, कोळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कोळी, बाबा नाईकवाडी, कोळी महासंघाचे मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.
आमदार रमेश पाटील म्हणाले, ऊसतोड कामगाराचा मुलगा राम सातपुते यांच्या रूपाने लोकसभेत निवडून जात आहे. आमदार राम सातपुते यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे. सोलापूरचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. भारताचे विकासपुरुष नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि ४०० खासदारांमध्ये राम सातपुते यांचा समावेश होण्यासाठी कोळी समाज बांधवांनी भाजपा आणि महायुतीची साथ द्यावी असे आवाहन रमेश पाटील यांनी केले.
आमदार राम सातपुते म्हणाले, कोळी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आगामी काळात प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. शासनस्तरावर प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. सोलापूरला २५ वर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी कोळी समाज बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला साथ द्यावी. असे आवाहनही राम सातपुते यांनी याप्रसंगी बोलताना केले.
अरुण लोणारी यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद सलगर यांनी सूत्रसंचालन केले तर महाराष्ट्र कोळी महासंघाचे सचिव सतीश धडे यांनी आभार मानले.









